सांगोला/ प्रतिनिधी :
एखतपूर रोड परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या भागासाठी नवीन उंच पाण्याची टाकी बांधणे तसेच जलशुद्धीकरण केंद्रापासून टाकीपर्यंत रायझिंग मेन टाकण्याचा ठराव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
नगरपरिषदेकडून १९९८ साली एखतपूर रोड परिसरात २ लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीतून पुजारवाडी, नवीन वसाहत, मस्के कॉलनी, बापू झंझे वसाहत, बनकर वस्ती, धोंडीराम जाधव वस्ती व धर्मा जाधव वस्ती या भागांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या परिसरात नवीन वसाहती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पाण्याचा पुरवठा अपुरा ठरत आहे. परिणामी काही भागात कमी दाबाने पाणी येणे किंवा पाणी न मिळण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, पाणीपुरवठा सभापती सौ. वैशाली सतीश सावंत, प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. सीमा समाधान सरगर तसेच नगरसेवक चैतन्य ज्ञानु राऊत यांनी हा विषय जनरल मीटिंगमध्ये मांडला. यास सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा देत ठराव मंजूर केला.
सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून अंदाजपत्रक व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळवून कामाला गती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या निर्णयामुळे एखतपूर रोड परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
